कौटुंबिक वादातून दारुड्या पतीने पत्नीचा धारधार शस्त्राने खून करुन स्वतः शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नायगाव तालुक्यातील नरंगल येथे (दि.११) रोजी सकाळी घडली. या प्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून मयत वडीलांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

नायगांव तालुक्यातील नरंगल येथील मुकींद भुजंग पट्टेकर हा दारुच्या नशेत नेहमीच पत्नीला मारहाण करुन भांडण करत होता. गुरुवारी रात्रीही शेतीच्या वादातून पत्नी रेणुकाबाई सोबत वाद झाला. पण हा वाद नेहमीचाच असल्याने रेणुकाबाई ही शुक्रवारी शेतात असलेल्या जनावरांचे दूध काढण्यासाठी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान शेताकडे गेली होती.

पत्नी शेतात गेली असल्याची संधी साधून पतीही पत्नीच्या मागेच शेतात गेला आणि धारधार शस्त्राने पत्नीचा शेतातच खून केला. पत्नी जाग्यावरच मृत्यू पावल्यानंतर पतीने स्वतः दुसऱ्याच्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

हेही वाचा- बालकाचा खून करणाऱ्यास पोलीस कोठडी

ही घटना गावात समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर काहींनी या घटनेबाबत नायगांव पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक रामराव पडवळ यांनी घटनास्थळाचा रितसर पंचनामा करुन दोघांचेही शव उत्तरीय तपासणीसाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. तपासणी झाल्यावर दोन्ही प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून याप्रकरणी मुलगा शिवाजी मुकींद पट्टेकर याच्या तक्रारीवरुन मयत मुकींद भुजंग पट्टेकर विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.