स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघर्ष समितीऐवजी स्वतंत्र कोकण सेना असे संघटनेचे नामकरण करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी जाहीर केले.
यावेळी शिवाजी देसाई, वाय. जी. राणे, मोतीराम गोठिवरेकर, सुरेश हाटे आदी पदाधिकारी होते. स्वतंत्र कोकण सेनेचे राज्य निर्मितीसाठी जुलैमध्ये संपूर्ण मुंबई-गोवा रोडवर महा आंदोलन छेडले जाईल असे प्रा. नाटेकर म्हणाले.
स्वतंत्र कोकण राज्याची मागणी कोकण प्रदेशातील कार्यकर्त्यांची आमसभा बोलावून ५ ऑक्टोबर २००३ रोजी करण्यात आली. माझी अध्यक्षस्थानी एकमताने निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई व पालघर अशा सात जिल्ह्य़ांचा कोकण प्रदेशात समावेश होतो. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशातील हा कोकण प्रदेश नैसर्गिकदृष्टय़ा चांगला आहे. उर्वरित महाराष्ट्रातून विकासाचे निकषही वेगळे हवेत असे प्रा. नाटेकर म्हणाले.
कोकणाची संस्कृती, भाषा, मानसिकता, हवामान, पाऊस, निसर्ग वेगळी असून, भिन्नतादेखील आहे असे प्रा. नाटेकर म्हणाले. कोकणच्या विकासासाठी स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती होण्यासाठी गेली चौदा वर्षे संघर्ष सुरू आहे असे प्रा. नाटेकर म्हणाले. स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून चळवळ सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. स्वतंत्र कोकणासाठी पुस्तकेही प्रकाशित केली. जनजागृतीसाठी स्वतंत्र कोकणच्या नावावर निवडणुका लढविण्यात आल्याचे प्रा. नाटेकर म्हणाले.
स्वतंत्र कोकण राज्य होण्यासाठी मागणी आहे तसेच आर्थिक विकासासाठी कोकणात स्वतंत्र मॉडेल उभारता येतील. राज्यघटनेच्या निकषाची पूर्तता होत असल्याने सात जिल्ह्य़ाचे स्वतंत्र कोकण राज्य होण्यास कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही असे प्रा. नाटेकर म्हणाले.
भाषावार राज्यनिर्मितीसाठी जनआंदोलन केल्यावर मिझोरम, झारखंड, उत्तरांचल, छत्तीसगड, तेलंगणा आदी अकरा राज्यांची निर्मिती झाली. त्यामुळे कोकणला स्वतंत्र राज्य निर्माण करावेच लागेल. त्यासाठी जुलै महिन्यात महामार्ग रोखला जाईल असेही प्रा. नाटेकर म्हणाले.