दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहरास पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या योजनेला कागलवासियांचा विरोध आहे. त्यासाठी लढा देऊ प्रसंगी रक्त सांडू, असा इशारा शनिवारी देण्यात आला.इचलकरंजीच्या पाणी योजनेला विरोध करण्यासाठी शेतकरी व नागरिकांच्यावतीने दूधगंगा नदी पात्रात कागल तालुक्यातील भाजप ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी दुधगंगा नदीवर धरणे आंदोलन केले. यावेळी येवली शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने बोलत होते. पाणी योजनेस तीव्र विरोध दर्शविणारे फलक घेतलेल्या कार्यकर्त्यांनी विरोधाच्या घोषणा दिल्या. बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाबगोंडा पाटील यांनी पाणी पिण्यासाठी राखीव असणारे, पाणी शिल्लकच नसल्याने इचलकरंजीला पाणी कोठून द्यावयचे? असा प्रश्न उपस्थित केला. पाणी वापर दिशाभूल - कागल शहराची लोकसंख्या ४२ हजार असून दीड टीएमसी पाणी लागते. तर मग इचलकरंजीची लोकसंख्या साडेतीन लाख असल्याने त्यांचे अर्धा टीएमसीवर कसे भागेल? असा प्रश्न उपस्थित करून, दिशाभूल करून सुरू असलेला पाणी नेण्याचा प्रयत्न हाणून पाडू,असा इशाराही यावेळी देण्यात आला.