तीव्र उष्म्यामुळे हैराण झालेले नागरिक आणि दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना आणखी काही काळ पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यंदा मान्सून आगमान उशीर होणार असून जून महिन्यात पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवली. जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. रामचंद्र साबळे म्हणाले की , सरासरीच्या तुलनेत कोकणात ९० टक्के, पश्चिम महाराष्ट्रात ९५ टक्के, उत्तर महाराष्ट्रात ९७ टक्के, मराठवाड्यात ९५ टक्के, पूर्व विदर्भात ९८ टक्के, मध्य विदर्भात ९८ टक्के तर पश्चिम विदर्भात ९५ टक्के पाऊस पडेल. तसेच वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै, ऑगस्टमध्ये राहुरी, कोल्हापूर, धुळे, जळगाव, परभणी येथे पावसात मोठे खंड पडतील. तर सोलापूर, पुणे, निफाड, अकोला, सिंदेवाही, दापोली, पाडेगाव व नागपुर भागात खंडीत वृष्टी राहणार, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात चांगला परतीचा पाऊस होणे शक्य आहे. मान्सून आगमनास उशीर होणार असल्याने जून महिन्यात पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या वितरणातील फरकाबरोबरच पावसात पडणारे खंड आणि कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस ही या हंगामातील मुख्य वैशिष्ट्य ठरण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.