अहमदनगरमध्ये लाच म्हणून सरकारी अधिकाऱ्याने दोन किलो मटण बिर्याणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. मंडलाधिकारी उल्हासराव कावडे असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून जमीन खरेदीप्रकरणी त्याने १४ हजार रुपये रोख आणि दोन किलो मटण बिर्याणी अशी लाच मागितली होती.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील मंडलाधिकारी उल्हासराव कावडे (वय ५७) याने तक्रारदाराकडे लाच मागितली होती. तक्रारदाराने जमीन खरेदी केली होती. जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर स्वत:चे नावे लावण्यासाठी आणि जमीन खरेदी खताच्या नोंदणीसाठी ते मंडलाधिकारी कावडे यांच्याकडे गेले होते. कावडे यांनी या कामाच्या मोबदल्यात १४ हजार रुपये रोख आणि दोन किलो मटण बिर्याणी मागितली. शेवटी तक्रारदाराने नाशिकमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी कावडे यांना १४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. याप्रकरणी कावडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.