नितीन आगे खून प्रकरणातील सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका झाली आहे. २०१४ मध्ये अहमदनगरच्या जामखेड येथील खर्डा गावातील नितीन आगे याची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणात सबळ पुरावे नसल्याने मुख्य आरोपी सचिन गोलेकर याच्यासह ९ आरोपींची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. जामखेड तालुक्यातील खर्डा येथे २८ एप्रिल २०१४ रोजी नितीन आगेची हत्या करण्यात आली होती. गावातील वरच्या जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून नितीनची संपूर्ण गावासमक्ष निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाकडे सुरुवातीला पोलिसांनी डोळेझाक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितीनच्या हत्याप्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर प्रशासनाला जाग आली. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नितीन आगे हत्याप्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी नितीनचे वडील राजू आगे यांनी गावातील सचिन गोलेकर आणि शेषराव येवले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी संबंधित मुलीचा भाऊ आणि तीन अल्पवयीन मुलांसह ९ जणांना अटक केली होती. या सर्वांवर हत्या आणि अन्य गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र सबळ पुराव्याअभावी जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.