अहमदनगर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पारनेर तालुक्यातील गुणोरे येथे ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुणोरे येथील एकाच शेतकरी कुटुंबातील चार जणांनी राहत्या घरामध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली. एकाच कुटुंबातील या चार जणांनी घरातील लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबाजी विठ्ठल बढे (40), कविता बाबाजी बढे (35)आदित्य बाबाजी बढे (15), धनंजय बाबाजी बढे (13) अशी मृतांची नावे आहेत. शेतकरी बाबाजी बढे यांनी पत्नी आणि मुलांचा खून करून स्वतः आत्महया केल्याचा संशय व्यक्त होत आहे. बाबाजी यांची पत्नी कविता या मानसिक आजारी होत्या तर आदित्य हा दिव्यांग होता. सातवीत शिकणारा धनंजय शाळेत अतिशय हुशार होता. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे या परिसरातून ग्रामस्थ जात असताना बाबाजी बढे यांच्या गोठ्यातील जनावरे का हंबरत आहेत म्हणून पाहिले असता घराचे दार खिडकी बंद होती. सकाळी लवकर उठणारे बढे का उठले नाही म्हणून त्यांनी घराची खिडकी उघडली असता हा प्रकार समोर आला आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.