खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटप करण्याचे श्रेय मिळविण्यावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत छुपा संघर्ष सुरू असून त्याचे पडसाद मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत आज, सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या जमीन वाटपाच्या सरकारी कार्यक्रमावर पडेल. प्रशासनाला निमंत्रण पत्रिकाही तयार करता आली नाही. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना निमंत्रण द्यावे लागले. मुख्यमंत्री व पवार यांच्यात असलेल्या छुप्या राजकीय संघर्षांत प्रथमच ते जाहीर सरकारी कार्यक्रमात एकत्र येत असल्याने त्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
अजित पवार हे आता साधे आमदार असल्याने राजकीय शिष्टाचार पाळताना अडचणी येत असल्याने एका ऐतिहासिक लढय़ाची सांगता होत असूनही त्याची जाहिरातबाजी सरकारला करता आली नाही. राष्ट्रवादी व कॉँग्रेसमधील ताणाताणीमुळे प्रशासनाला निमंत्रण पत्रिका तयार करता आली नाही. आमदार, खासदार, मंत्री, माजी लोकप्रतिनिधी यांना जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांना पत्र पाठवून उपस्थित राहण्याची विनंती करावी लागली. ससाणे यांनीही खंडकरी कृती समितीच्या नावे पत्रक काढून शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले. पूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. पण दोन दिवसांपूर्वी त्यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले. आता ते आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमवेत ससाणे यांचे कट्टर विरोधक माजी आमदार भानुदास मुरकुटे हेही असतील.
पवार हे साधे आमदार आहेत. मंत्री नाहीत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याचा सरकारी कार्यक्रम जाहीर झाला नाही. असे असले तरी त्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या सरकारी शिष्टाचाराप्रमाणे वागविले जात आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याचा सरकारी कार्यक्रम प्रसिद्ध करणे, सरकारी जाहिरातबाजी करणे आदी टाळण्यात आले आहे. प्रशासनाची मोठी गोची व दमछाक झाली आहे. पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हा पहिलाच सरकारी कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे.