शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस, गारपीठ, दुष्काळ अशी संकटे आल्यावर पवारसाहेब मदत करत होते. परंतु आज नुसत्या घोषणा केल्या जात आहेत. हे सरकार आहे की भिताड आहे असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील जाहीर सभेत ते बोलत होते. चार महिने झाले दुधाचे ५०० कोटी रुपये अनुदान देण्याचे बाकी राहिले आहेत. कशी जगवायची जनावरं. कसं दुध देणार गायी.असा सवालही अजित पवार यांनी यावेळी विचारला. आम्ही कारखाने, उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करत होतो परंतु आजचे हे सरकार लक्ष देत नाहीय. अहो मंत्रीच ऊसाला एफआरपी देत नाहीत तर तुम्हाला काय मिळणार आहे ही अवस्था आज आहे अशी टीका अजित पवार यांनी केली. ज्याचं कुटुंब नाही. लग्न झालेले नाही अशा बिनसंसारी माणसाच्या. फकीराच्या हातात देश दिला असेल तर अशा माणसाला वाढलेली महागाई कशी लक्षात येईल असा टोला अजित पवार यांनी लगावला. आमचे सरकार असेपर्यंत ऊसाला साडेसहा रुपये दर देत होतो आणि हे सरकार ४ रुपये देत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती न समजणारे सरकार असेल तर काय अवस्था होते हे आज लक्षात येत आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. आधी राममंदिर बांधणार मग सरकार असे उद्धव ठाकरे सांगत आहेत. अरे चार वर्षे झोपला होतात का? असा सवाल करतानाच अरे उद्धवा अजब तुझे सरकार असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. माणसांच्या जाती काढून यांनी राजकारण केले आणि आता देवांच्या जाती काढून हे भाजपावाले राजकारण करत आहेत. यांच्या सुपीक डोक्यातून या कल्पना येत आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं. सत्तेची मस्ती यांच्या डोक्यात शिरलीय. सत्तेचा माज आलाय या सरकारला. हे तुमचं माझं सरकार नसून सुटाबुटातील लोकांचे आहे अशी टीका अजित पवार यांनी केली.