परळीत अजित पवार, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी बावीस मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले. पण सरकारला जे नको होते त्याच एका मंत्र्याला बाहेर काढले असून बाकीच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट देऊन टाकली. राज्याचे प्रश्न मांडण्याची आणि जिल्ह्यात पालकमंत्री कोणी असले तरी विकासाचे प्रश्न सोडवण्याची धमक केवळ धनंजय मुंडे यांच्याकडेच असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत विजयी करुन परळीकरांनी राज्याचे नेतृत्व करण्याची संधी धनंजय यांना द्यावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले. परळी येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेतील पाचव्या दिवसातील शेवटची सभा झाली. पक्षाचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह जिल्हाभरातील पक्षाचे नेते उपस्थित होते. सभेसाठीची गर्दी पाहून अजित पवार म्हणाले, हल्लाबोल यात्रा सुरू करताना सरकारविरुध्दचा रोष इतक्या मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर येईल, असे वाटत नव्हते. मात्र, पाचच दिवसात सभांना होणारी गर्दी ही जनता सरकारला त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षनेते म्हणून धनंजय यांनी मागील तीन वर्षांत सभागृहात बावीस मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले. मात्र, भाजप सरकारला जो एक मंत्री एकनाथ खडसे नको होते त्यांनाच केवळ सत्तेबाहेर काढले. बाकीच्या मंत्र्यांना मात्र मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली आहे. मोपलवारसारखे अधिकारी पुन्हा पदावर समृध्दी मार्गामध्ये मोपलवारसारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याची तत्काळ चौकशी पूर्ण करुन त्याला पुन्हा पदावर रुजू करुन घेण्यात आल्यामुळे या सरकारवरचा विश्वास आता उडाला आहे. जिल्ह्यात पालकमंत्री पद कोणाकडेही असो. मात्र, मतदारसंघ आणि जिल्ह्याचा विकास करण्याची धमक केवळ धनंजय मुंडे यांच्यात असल्याचे स्पष्ट करुन सरकारच्या कारभारावर अजित पवार यांनी सडकून टीका केली.