“देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत आहे. स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे. याचं श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात स्त्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट व सहन केलेल्या हालअपेष्टांना जातं. देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

“क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला सत्यशोधक विचार आणि रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरच आजचा प्रगत… पुरोगामी… समर्थ भारत उभा आहे,” असेही अजित पवार म्हणाले. “क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंची समर्थ साथ लाभली. देशात स्त्रियांची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरु केली आणि त्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका होण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी उचलली. स्त्रियांच्या शिक्षणासाठी या दोघांनी केलेले कार्य व घेतलेले कष्ट सदैव स्मरणात राहतील,” असं प्रतिपादन अजित पवार यांनी केलं.

“क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थाने देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत. सावित्रीबाईंनी महिलांच्या सक्षमीकरसाठी काम केले. महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्या सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. त्यांचे कार्य आणि विचार पुढे नेण्यासाठी राज्य शासनातर्फे त्यांचा जन्मदिन ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला ‘महिला शिक्षण दिना’च्या शुभेच्छाही दिल्या.