राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा आज (सोमवार) सातवा दिवस आहे. माहूर येथे रविवारी सभा झाल्यानंतर आज हिंगोली येथील सभेला हल्लाबोल यात्रा मार्गक्रमण करत होती. यावेळी घडलेला एक किस्सा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

हल्लाबोल यात्रेसाठी अजित पवार आपल्या गाडीतून हिंगोलीकडे चालले होते. प्रवास करत असताना अजितदादांना अचानक कॉफीची तल्लफ लागली. यावेळी अजितदादांचा गाड्यांचा ताफा शहरापासून दूर माळेगाव फाटा परिसरात होता. याठिकाणी रस्त्यावर कुठेच चांगले हॉटेल दिसत नव्हते. त्यामुळे गाडीच्या चालकाने कुठेतरी एखादे चांगले हॉटेल बघून गाडी थांबवतो, असे सांगितले. मात्र, अजितदादांनी कोणताही अनमान न बाळगता कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाटा येथील एका टपरीवर जाऊन कॉफीची तल्लफ भागवली. अजितदादा कॉफी पिण्यासाठी टपरीवर आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. कॉफी तयार होईपर्यंत अजितदादांनी चहावाल्याशी गप्पाही मारल्या. टपरीवर आणखी काय स्पेशल मिळते असे विचारल्यावर इथे भजी आणि खिचडी फेमस असल्याचे चहावाल्याने सांगितले. तेव्हा गरम गरम भज्यांचाही दादांनी यावेळी आस्वाद घेतला.