अलिबाग रेवस मार्गाची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही रस्ता दुरुस्तीचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे सावर्जनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधण्यासाठी सह्य़ांची मोहीम सुरु करण्यात आली आहे. पावसाळ्यात अलिबाग रेवस मार्गाची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली होती. वरसोली, थळ, चोंढी परिसरात मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांचे आणि प्रवाशांचे हाल होत होते. पावसाळ्यानंतर रस्ता दुरुस्तीची कामे सुरु होईल. अशी अपेक्षा होती. मात्र नोव्हेंबर महिना सुरु झाला तरी रस्ता दुरुस्तीची कामे सुरु होऊ शकलेली नाहीत. खराब रस्त्यांमुळे या मार्गावर चालणाऱ्या रिक्षा चालकांच्या गाडय़ाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चात वाढ झाली आहे. याशिवाय वाहनचालक प्रवासी यांना मणक्याचे तसेच श्वसनाचे आजार उद्भवण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विविध संघटनांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र रस्ता दुरुस्तीचे काम सुरु होऊ शकलेले नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे अलिबाग चोढी रेवस मार्गावरील ० ते १२ किलोमीटर रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. यासाठी १६ लाख ८९ हजारांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. मात्र तरीही ठेकेदारांनी रस्ता दुरुस्तीचे काम सुरु केलेले नाही. बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधण्यासाठी आता सह्य़ांची मोहीम सुरु करण्यात आली आहे. प्रवाशी, वाहनचालक आणि स्थानिकांच्या सह्य़ा घेऊन याचे एकत्रित निवेदन राज्यसरकारला सादर केले जाणार आहे. हा मार्ग अलिबागच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. मुंबई ते अलिबाग चालणाऱ्या जलवाहतुकीसाठी या मार्गाचा वापर केला जातो. मुंबईहून मांडवा जेटीवर उरतणारे पर्यटक याच मार्गाने अलिबागमध्ये दाखल होत असतात. दररोज तीन ते साडेतीन हजार पर्यटक आणि स्थानिक या मार्गाचा वापर करतात. मात्र तरीही रस्ता दुरुस्तीच्या कामाकडे बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याचा आरोप केला जात आहे. ‘पावसाळा संपून तीन महिने झाले. बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्तीचे काम सुरु केलेले नाही. धुळ आणि खड्डय़ांमुळे स्थानिकांना फुफुस्सांचे आणि मणक्यांचे विकार व्हायला लागले आहेत. स्थानिक पुढाऱ्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवरोधात आम्ही सह्य़ांची मोहीम सुरु केली आहे. चांगले रस्ते आमचा हक्क आहे. शासनाकडे याबाबतचे लेखी निवेदन आम्ही देणार आहोत.’ - दिलीप जोग, सामाजिक कार्यकत्रे.