राज्यात सामाजिक व धार्मिक एकोपा राखण्यासाठी सर्व राजकीय मंडळींनी सगळ्या स्वरुपाचे भेद दूर सारून एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी केले आहे. ते धुळे येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. धुळे एक कॉस्मोपॉलिटन शहर असल्याने याची सुरुवात येथूनच होऊ शकते, असेही पवार यावेळी म्हणाले.


धुळे महानगरपालिकेच्या नुतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, धुळे हे तीन राष्ट्रीय महामार्गावर असलेले भारतातील एक मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याचा फायदा धुळे शहर व जिल्ह्यासाठी कसा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी काही ध्येय-धोरणे, योजना आखता येतील का? याचा विचार करण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच धुळ्याच्या विकासासाठी जर कुठे शब्द टाकायचा असल्यास मी त्यासाठी सदैव तयार आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.

धुळे शहराने महात्मा गांधी, पंडितजी नेहरू, वि. दा. सावरकर, यंशवंतराव चव्हाण या थोर नेत्यांना मानपत्र देऊन सन्मानित केले आहे. त्याच धुळ्याच्या महानगरपालिकेने आज मला मानपत्र देऊन सन्मानित केले. त्यामुळे मी धुळेकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, अशा शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नूतन प्रशासकीय इमारतीच्या रूपाने शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी वास्तू धुळेकरांनी उभी केली आहे. १८६० साली स्थापन झालेल्या महानगरपालिकेने एवढा मोठा प्रवास करून आज नव्या वास्तूत प्रवेश केला. याचा आपल्याला आनंद होत असल्याचेही यावेळी पवार म्हणाले.