आटपाडीच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही राहणार असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील सांगत असतानाच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा करून हाच कार्यक्रम प्रचाराचा शुभारंभ असल्याचे शनिवारी घोषित केले. आटपाडीतील ५३ गावांसाठी ९२ कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. अध्यक्षस्थानी राजेंद्र देशमुख होते.या वेळी पाटील म्हणाले, की आटपाडीकरांवर विधानसभेच्या उमेदवारीबाबत अन्याय झाला आहे. तो दूर करण्याचा या वेळी नक्की प्रयत्न केला जाईल. विटय़ाचे माजी आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेत जाण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून पक्षासाठी थोडे थांबण्याची तयारी हवी. माझ्यामुळेच आटपाडीच्या कार्यकर्त्यांना थांबावे लागले हा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल.या वेळी अमरसिंह देशमुख यांनी पक्षाची उमेदवारी मिळण्याची खात्री नसल्याने पाणी योजनेचा आजचा शुभारंभच निवडणुकीचा प्रचार शुभारंभ असल्याची घोषणा केली. बाबासाहेब देशमुख यांनी आटपाडी तालुका केला, राजेंद्र देशमुख यांनी टेंभू योजना निर्मितीत मोलाची कामगिरी केली. आटपाडीच्या माथी असणारा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्यानेच आपली उमेदवारी लोकांच्या पािठब्याने असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी राजेंद्र देशमुख यानी सांगितले, की आटपाडीला राजकीय पक्षाने कधी उमेदवारी दिलीच नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांनी मोलाची साथ केली. या वेळी सभापती अलका भोसले, उपसभापती बळवंत मोरे, रावसाहेब पाटील, भाऊसाहेब गायकवाड, आटपाडीच्या सरपंच स्वाती सागर आदी उपस्थित होते.