अमित देशमुख, पंकजा मुंडे या वारसदारांची पराभवाची मालिका राजकारण कायम भावनेवर चालत नाही त्याला कर्तव्याची जोड देण्यासाठी कर्तृत्व सिद्ध करावे लागते. राजकारण सुरू करताना, ज्यांच्या हाती शून्य होते त्या मंडळींनी आपल्या अथक परिश्रमातून डोंगराएवढी कामे उभी केली याची अलीकडच्या काळातील दोन ठळक उदाहरणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख व गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे पाहता येईल. घरात कसलाही राजकारणाचा वारसा नसताना प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर विधायक कामे उभी केली अन् जनतेच्या मनावर अधिराज्यही गाजविले हा ताजा इतिहास आहे. दोघांचेही अकाली निधन झाले. त्यांच्या राजकीय वारसांना मात्र अजून बरीच मजल गाठावी लागणार आहे. कारण दोन्ही तरुण नेत्यांना स्थानिक जनतेने विविध निवडणुकांमध्ये नाकारले आहे. विलासराव देशमुखांचे पुत्र अमित व गोपीनाथराव मुंडेंची कन्या पंकजा हे दोघेही त्यांच्या हयातीत आमदार होते. वडिलांच्या निधनानंतर दोघांनाही वारसाहक्काने मंत्रिपद मिळाले. जनतेने प्रचंड प्रेमही केले मात्र आपल्या प्रेमाची किंमत केली जात नाही हे लक्षात आल्यानंतर जनतेने आपल्या मायेचा पान्हा आटवण्यास सुरुवात केली. एकाच वेळी सर्व पान्हा आक्रसून न घेता टप्प्याटप्प्याने जाणीव करून देत कासेतील दूध आकसून घेणे सुरू केले. समजदार माणसाला केवळ इशारा पुरतो असे सांगितले जाते. तो इशारा समजून घेतला जात नाही हे लक्षात आल्यानंतर एकामागून एक धक्के जनतेने दिले. विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांना राज्यात ग्रामविकास खाते मिळाले. शिवाय बीड, लातूर या दोन जिल्हय़ांचे पालकमंत्रिपदही देण्यात आले. विलासराव व गोपीनाथराव यांचे जसे प्रेम होते तसेच प्रेम पुढील पिढीतही सुरू राहील असे जाहीरपणे पंकजाने सांगितले. अर्थात असे सांगण्याला कोणाचीही हरकत नव्हती. मात्र त्यांनी ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांवर निव्र्याज प्रेम केले होते तो वारसा पुढील पिढीनेही चालवावा अशी माफक अपेक्षा जनतेची होती. प्रत्येक व्यक्ती भिन्न असतो. पुढील पिढीत सर्वच गोल जसेच्या तसे उतरतील ही अपेक्षा करणेही गर आहे हेही लोकांना कळते, मात्र कार्पोरेट कल्चर पुणे-मुंबईत ठीक आहे. गावाकडचे लोक आपुलकीचे भुकेले आहेत. एक वेळ त्यांचे काम नाही केले तरी चालेल, मात्र त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल असे वागणे ते खपवून घेत नाहीत. सामान्य जनतेची इतकी माफक अपेक्षाही पूर्ण होत नसल्याबद्दल परळीत व लातुरात पंकजा आणि अमितरावांना पराभवांच्या मालिकांना सामोरे जावे लागते आहे. सोमवारी परळी बाजार समितीतील निकालानंतर आपल्या मतदारसंघात पंकजा मुंडे यांनी पराभवाची हॅट्ट्रिक साधली. या पराभवातून विधानसभा निवडणुकीत काय वाढून ठेवले आहे हे जनतेने दाखवून दिले आहे. परळीत धनंजय मुंडे हे सख्खे चुलतभाऊ पर्याय म्हणून समोर आहेत तर लातुरात समर्थ पर्याय नसतानाही अमित देशमुखांची घसरण थांबत नाही. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नुकत्याच झालेल्या लातूर मनपा निवडणुकीत अमित देशमुखांना दारुण पराभव चाखावा लागला. भाजपाचे संभाजी पाटील निलंगेकर हे जिल्हय़ाच्या नेतृत्वाचा चेहरा आहेत. लातूर विधानसभेसाठी भाजपने कोणताही चेहरा पुढे न करता यश संपादन केले आहे. क्रिकेटच्या भाषेत अमित देशमुख लातुरात सातत्याने सेल्फ आऊट होत आहेत. वारसा हक्काप्रती जागरूक व उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही या भावनेने जनसेवेचे काम करेन ही घेतलेली शपथ विसरती आहे असे जनतेला वाटले तर पराभवाची मालिका कोणालाही रोखता येणार नाही. अर्थात आणखीन संधी आहे सुधारणा करण्याची, त्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी आहे. या संधीचा कसा उपयोग केला जातो हे महत्त्वाचे ठरणार आहे.