शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. तसंच आताही दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदार संजय राऊत यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. तसंच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि राऊत यांच्यावर निशाणाही साधला.

“संजय राऊत यांनी राज्याच्या ठेका घेतला आहे का? त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. ते सतत महिलांचा अपमान करत आहेत. त्यांनी आपली मर्यादा साभाळावी,” असं राणा यावेळी म्हणाल्या. “कुठे ना कुठे मुख्यमंत्र्यांचं राऊतांना समर्थन आहे असं वाटत आहे. जर मुख्यमंत्र्यांचं राऊत यांना समर्थन असेल तर मुख्यमंत्री बाहेर येऊन त्यांचं समर्थन करतील आणि जर त्यांचा राऊत यांना विरोध असेल तर त्यांनी राऊत यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा घ्यावा,” असं त्या म्हणाल्या.

अनेक वेळा राऊत यांनी राजकीय व्यक्तींवर किंवा अराजकीय व्यक्तींवर आपल्या वृत्तपत्रातून टीका केली आहे. त्यांच्यावर त्यावरून कधीही कारवाई झाली नाही. तर करोनाच्या काळात कोणाच्याही कार्यालयावर त्वरित कारवाई करण्याची आवश्यकता काय होती?. जर महाराष्ट्राच्या जनतेसाठी काही करायची इच्छा असेल तर मुख्यमंत्र्यांनी मातोश्री सोडून बाहेर पडावं. भंडारा-गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला. तेथे मुख्यमंत्री गेले नाही. तरूणांची परिस्थिती, शेतकऱ्यांची गोरगरीबांच्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेणं आवश्यक असल्याचंही त्या म्हणाल्या.