विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्यांमुळे तर सोशल नेटवर्किंगवरील वक्त्यांमुळे अमृता या चर्चेत असल्याचे चित्र पहायला मिळतं. अनेक विषयांवर अमृता या ट्विटरच्या माध्यमातून आपली मत मांडत असतात. यावरुन अनेकदा त्या शिवसेनाविरोधी वक्तव्य करताना दिसतात. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडूनही अमृता यांनी केलेल्या टिकेला उत्तर येतं. याचसंदर्भात एका मुलाखतीमध्ये अमृता यांना प्रश्न विचारण्यास आला असता त्यांनी आपण योग्य मुद्द्यावर बोलतो मात्र शिवसेना तसं करत नाही असं मत व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> गाण्यावरील ट्रोलिंगमुळे निराश व्हायला होतं का?; अमृता फडणवीस म्हणतात… 

अनेकदा तुमच्यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून टीका होते. शिवसेनेला शवसेना म्हणणं असो किंवा आदित्य ठाकरेंबरोबर रंगलेलं ट्विटवॉर असो किंवा प्रियंका चतुर्वेदींसोबत रंगलेलं ट्विटवॉर असो एका मित्र असलेल्या पक्षाबरोबर आता जे बदलेलं नातं आहे त्याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न अमृता यांना ‘मुंबई तक’च्या विशेष मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. सोशल नेटवर्किंगवर प्रचंड अ‍ॅक्टीव्ह असणाऱ्या अमृता या अनेकदा राज्यातील सत्ताधारी पक्ष, मुंबईतील प्रश्न यासंदर्भात ट्विटवरुन व्यक्त होत असतात. याच पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अमृता यांनी, “खूप वेळा असं होतं की नाती बदलतात. अशावेळी आपण ज्या कुरुक्षेत्रात आहोत, ज्या बाजूने आहोत त्या बाजूने आपण बोलतो. तिथे आपली बाजू मांडण्यासाठी आहे, काहीतरी बोलण्यासारखा विषय आहे असं वाटल्यास मी ही बोलते,” असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> “फक्त गाण्याचा एक कार्यक्रम ठेवा, मग कराची आपलीच!”

पुढे बोलताना, “साहाजिकपणे आता आम्ही (भाजपा आणि शिवसेना) एकमेकांच्या विरोधात आहोत तर ते ही माझी काही स्तृती नाही करणार. त्यामुळे मला जेव्हा काही व्हॅलीड मुद्दे मिळाले की मी ही त्यावर बोलणार. फरक इतकाच आहे की मी योग्य मुद्दा सापडल्यावर बोलते आणि ते (शिवसेनेमधील) लोकं कशावरही बोलतात. ते नको व्हायला. बाकी आताच्या राजकीय परिस्थितीनुसार आणि संविधानाने दिलेल्या हक्कानुसार बोलणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.” असं मत अमृता यांनी मांडलं.

जेव्हा दोन पक्ष मित्र पक्ष असतात तेव्हा कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात. मात्र युती तुटली म्हणजे हे कौटुंबिक संबंधही तुटले किंवा तुटतात असं होतं का? यावर उत्तर देताना, अमृता यांनी नाही नक्कीच नाही असं उत्तर दिलं. “कोणत्याही विरोधीपक्षातील नेते एकमेकांना भेटतात तेव्हा ते प्रेमानेच भेटतात. ज्यावर नेते बोलतात ते राजकीय किंवा प्रोफेशनल विरोध असतो. पण खासगी आयुष्यात कोणालाही कोणाबद्दल हेवेदावे नसतात आणि नसायलाच पाहिजे,” असं आमृता म्हणाल्या. आम्ही तरी सध्या योग्य मुद्दे घेऊन समोर येतो. कुठे ते योग्य मुद्द्यांवर बोलतायत कुठे नुसता विरोध करण्यासाठी करतायत हे शिवसेना त्यांचं त्यांच पाहून घेतील, असंही मत अमृता यांनी व्यक्त केलं.

ट्रोलिंगबद्दलही मांडलं मत…

“ट्विटर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मत व्यक्त करतो तेव्हा त्याच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्याचा हक्क असतो. तसा हक्क मी ही बजावते. अनेकदा मी माझी मत सोशल नेटवर्किंगवरुन मांडत असते. कधी मी ट्रोल होते तर कधी माझं कौतुक होतं. हे पार्ट अ‍ॅण्ड पार्सल ऑफ लाइफ आहे,” असं मत अमृता यांनी व्यक्त केलं.