विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ६ पैकी ५ जागा जिंकल्या. तर भाजपाला धुळे-नंदुरबारची एकमेव जागा मिळाली. नागपूर, पुणे, औरंगाबाद याासाख्या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. त्यामुळे भाजपासाठी हा धक्कादायक पराभव असल्याचं बोललं जात आहे. या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट चर्चेत आहे. भाजपाला ६ जागांपैकी केवळ १ जागेवर विजय मिळवता आला. तीन पक्षांच्या एकत्रित प्रयत्नांपुढे भाजपाचे प्रयत्न तोकडे पडले. या निवडणुकीत शिवसेनेच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे भाजपाकडून सेनेच्या नेतत्वावर टीका केली जात आहे. असे असताना अमृता फडणवीस यांनी भाजपाच्या धक्कादायक पराभवाबाबत एक ट्विट केले आहे. "सध्या सुरूवात वाईट झाली आहे. पण या वाईट सुरूवातीचा शेवट हा नक्कीच चांगला आणि सकारात्मक होईल", असं ट्विट त्यांनी केलं. यासोबत त्यांनी जय महाराष्ट्र असा हॅशटॅगदेखील वापरला. This bad beginning will surely lead to a good ending ! #JaiMaharashtra @BJP4Maharashtra — AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 4, 2020 देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? "नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचा किमान एकतरी उमेदवार विजयी झाला. पण शिवसेनेच्या हाती मात्र काहीही लागलं नाही. त्यांचा एकही उमेदवार जिंकलेला नाही. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही हे खरं. परंतु या तीन पक्षातील केवळ दोघांनाच या निवडणुकीचा फायदा झाला आणि एका पक्षाला मात्र एकही जागा मिळालेली नाही. ज्यांचा राज्यात मुख्यमंत्री आहे, त्यांच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही ही गंभीर बाब असून त्यांनी आता याचं आत्मचिंतन करावं", असा टोला फडणवीस यांनी लगावला.