एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी व कवी वरवरा राव यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावत चालली होती. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना आवश्यक सुविधा देण्याची मागणी केलेली होती. दरम्यान, वरवरा राव यांची करोना चाचणी करण्यात आली होती. रिपोर्ट आल्यानंतर त्यांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणी तेलगू कवी व सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव सध्या अटकेत आहेत. वरवरा राव यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती खालावत चालली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी आवश्यक वैद्यकीय सुविधांची मागणी केली होती. अखेर वरवरा राव यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे.

राव सध्या ८१ वर्षांचे असून त्यांना नुकतेच नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात नेण्यात आले आहे. तेथे त्यांच्या खालावणाऱ्या प्रकृतीबाबत चिंता वाटत असल्याचे त्यांची पत्नी, मुलगी आणि इतर कुटुंबीयांनी सांगितले. राव यांच्या प्रकृतीविषयी त्यांचे कुटुबीय काही दिवसांपासून चिंतेत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी याविषयी माहितीही दिली होती. ‘२८ मे रोजी राव यांना जेजे रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसतानाही त्यांना तीनच दिवसांत पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले. पोलिसांच्या परवानगीने त्यांचे कुटुंबीयांशी दूरध्वनीवर बोलणे होत असताना त्यांचा आवाज क्षीण झाला होता. ते गोंधळलेले वाटत होते आणि त्यांना बोलणे जड जात होते’,असे राव यांच्या पत्नीने ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले होते.