करोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून राज्यातील बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत येणा-या अंगणवाड्यांमध्ये दिले जाणारा शालेयपूर्व शिक्षण व पोषण आहारही स्थगित करण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी तीन ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांना घरपोच शिधा देण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत संपूर्ण राज्यात १०० टक्के गरम ताज्या आहाराऐवजी कोरडा शिधा वाटपाचे उद्दिष्ट महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आखले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीतही राज्याचा कारभार नेटाने हाकण्याचा प्रयत्न सरकार तर्फे होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, १७ एप्रिल रोजी महिला व बालकल्याण मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) यांच्याशी संपर्क साधून आढावा घेतला. आणखी वाचा- १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत करणार ठाकरे सरकार करोनामुळे अंगणवाड्यांमध्ये तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना दिले जाणारे शालेयपूर्व शिक्षण व पोषण आहार हे उपक्रम सध्या बंद आहेत. मात्र, बालकांच्या पोषण आहारात खंड पडू नये यासाठी त्यांना घरपोच शिधा देण्याचे आदेश यशोमती ठाकूर यांच्यातर्फे देण्यात आले आहेत. गरम ताज्या आहाराऐवजी बालकांना १५ मे पर्यंत घरपोच शिधा दिला जाणार आहे. महाराष्ट्र कन्झ्युमर्स फेडरेशन लिमिटेडतर्फे हा शिधा पोहोचवला जाणार आहे. आतापर्यंत संपूर्ण राज्यात ४० टक्के पुरवठा झाला असून येत्या १५ दिवसांत राज्यभरात १०० टक्के शिधापुरवठा केला जाणार आहे. शिधा घरपोच देताना सामाजिक दूरीचे काटेकोर पालन केले जात असून मास्क व हँडग्लोव्हजचा वापर केला जात आहे.