टेंभू ग्रामस्थांची प्रशासन, पोलिसांकडे मागणी कराड : ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुतळय़ाच्या विटंबनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. वृत्तपत्र व सामाजिक क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पुतळा विटंबन प्रकरणी शनिवारी रात्री अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सोमवारी टेंभू ग्रामस्थांनी घडल्या घटनेचा निषेध करताना, हे गैरकृत्य करणाऱ्यास कठोर शासन व्हावे अशा मागणीचे निवेदन आज प्रशासनास व कराड ग्रामीण पोलिसांना सादर केले आहे. केसरी, सुधारक या वृत्तपत्रांचे संस्थापक, संपादक गोपाळ गणेश आगरकर यांच्या टेंभू (ता. कराड) या जन्मगावी आगरकर यांच्या अर्धाकृती पुतळय़ाची रात्रीच्या अंधारात समाजकंटकांकडून मोडतोड केली गेल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. मात्र, हा गंभीर प्रकार लोकांसमोर येऊनही पोलिसात मात्र याबाबत गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याने हे गैरकृत्य दडपण्याचा प्रकार होतोय की काय? अशी शंका उपस्थित होऊ लागली. दरम्यान, शनिवारी रात्री अज्ञाताने आगरकर यांच्या पुतळय़ाची मोडतोड केल्याची तक्रार गावचे सरपंच युवराज भोईटे यांनी दिल्याने या घटनेची पोलिसांकडे नोंद झाली. आज टेंभूतील ग्रामस्थांनी पुतळा विटंबनेचे गैरकृत्य करणाऱ्यास तातडीने पकडून कठोर शासन करण्याची मागणी केली असून, आंदोलनाची तयारीही दर्शवली आहे. रविवारी सकाळी आगरकर यांच्या वारसांनी पुतळय़ाच्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. त्या वेळी पोलीसही उपस्थित होते. पुतळा विटंबना करणाऱ्याला जेरबंद करून कठोर शासन व्हावे, तपासाला गती मिळावी अशी अपेक्षा आगरकर परिवारातील या सदस्यांनी पोलिसांकडे केली. हे प्रकरण शासनातील प्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देण्यात आले असून, वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांपर्यंत ते नेण्यात येईल, असे त्यांनी या वेळी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.