माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन आता ईडीनेही गुन्हा दाखल केलेला आहे. ईडीकडून आता देशमुखांची पुढील चौकशी होणार आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर सीबीआय म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानेही गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशमुखांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी काही खळबळजनक आरोपही केले आहेत. आपण न केलेल्या गुन्हांची शिक्षा देण्याचं काम केवळ राजकीय हेतुपोटी चालू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

त्याचबरोबर त्यांना आपली ईडीकडून चौकशी होणार ही बाब माध्यमांमधून कळली असल्याचंही ते म्हणाले. त्यांनी मोदी सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणतात, “मी गृहमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरणामध्ये कारवाई केली. त्याचबरोबर पूर्वी महाराष्ट्रात सीबीआयला कोणाचाही तपास करण्याची मुभा होती. मात्र शासनाच्या परवानगीशिवाय कोणाचाही तपास करता य़ेणार नाही असा निर्णय आम्ही घेतला. तसंच दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर तो प्रश्न जेव्हा विधानसभेत निघाला तेव्हा आमदारांच्या मागणीनुसार या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची नेमणूक केली. या सगळ्या कारणांमुळे केंद्र शासन नाराज असू शकते. म्हणूनच माझी सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून चौकशी होत आहे.”

हेही वाचा- “…आता पुढचा नंबर अनिल परब यांचा लागणार”

त्याचबरोबर आपण सीबीआयला जसं सहकार्य केलं त्याच पद्धतीने ईडीच्या चौकशीला सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच सत्य परेशान हो सकता है, पराजित नही असंही ते या व्हिडिओमध्ये म्हणाले.

आणखी वाचा- आता ईडीनेही दाखल केला गुन्हा….अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ!

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्ट कारभाराचे आरोप करण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि संजय पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, त्याचबरोबर अनेक अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या ते भ्रष्ट मार्गाने करत होते, असे आरोप अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आले आहेत.त्यामुळेच त्यांची आता ईडीकडूनही चौकशी होणार आहे.