अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता तब्बल तीन महिने लोटले आहेत. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे गेला. इतर दोन केंद्रीय तपास यंत्रणांचाही या प्रकरणात प्रवेश झाला. सध्या वेगवेगळ्या भूमिकेतून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. मात्र, अद्यापही सुशांत सिंहच्या प्रकरणाचा उलगडा झालेला नाही. या प्रकरणाची चर्चा होताना मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल का केला नाही? असा प्रश्न सातत्यानं समोर येतो. त्यावरून शंकाही उपस्थित केला जातात. अखेर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एफआयआर दाखल न करण्यामागील कारणाचा उलगडा केला आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘मुंबई पोलिसांनी एफआयआर का दाखल केला नाही’, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना देशमुख म्हणाले, “आपल्याला सांगतो की, जेव्हा सुशांत सिंहच्या वडिलांसह त्याचे सर्व कुटुंबीय इथे मुंबईला आले होते. त्यांनी स्वतः सांगितलं होतं. स्वतः लिहून दिलं होतं की, ही आत्महत्या आहे आणि आमचा कुणावरही संशय नाही, असं लिखित त्याच्या वडिलांनी दिलं होतं. त्यामुळे एफआयआर कुणावर दाखल करायचा? त्यांनी म्हटलं असतं की आम्हाला अमूक एका व्यक्तीवर संशय आहे, तर.. आणि तांत्रिक गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. असं काही असतं तर सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या निरीक्षणात मुंबई पोलिसांबद्दल तसा उल्लेख केला असता. पण मुंबई पोलिसांनी अतिशय चांगला तपास केला, असा उल्लेख सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशात आहे,” असं गृहमंत्री देशमुख म्हणाले.

“सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्यात आता ड्रग्ज कारवाई करण्यात आली. पण मूळ प्रश्न कायम आहे. सुशांत सिंहचा मृत्यू आत्महत्या की हत्या. याचा सीबीआयनं तातडीनं तपास करायला हवा,” असा प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला.