भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असं खडसे यांनी मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याची टीकाही केली आहे. या वेळेस खडसेंनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचेही नाव घेतलं. अंजली दमानिया यांच्या तक्रारीनंतर माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असं खडसे यावेळी म्हणाले. खडसे यांनी थेट नावासहीत उल्लेख केल्यानंतर दमानिया यांनी आता ट्विटर तसेच एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

खडसे नक्की काय म्हणाले

“देवेंद्र यांनी ज्याप्रक्रारे विनयभंगाचा खटला दाखल केला, भूखंडाचं प्रकरणी चौकशी लावली, त्या सर्वांमधून मी सुटलो, पण मनस्ताप किती झाला. विनयभंगाचा खटला दाखल कऱणं, कोर्टात ते चालणं यापेक्षा मरण परवडलं. मी जेव्हा त्या अंजली दमानियांच्या तक्रारीवरुन खटला दाखल करण्यासंबंधी देवेंद्रजींना विचारलं तेव्हा ते म्हणाले ती महिला फार गोंधळ घालत होती, टीव्हीवर दाखवलं जात होतं म्हणून नाईलाजाने सांगितलं. नियमानुसार काम करा असं सागता आलं असतं. मला बदनामी सहन करावी लागली. इतक्या खालच्या स्तरावरुन जाऊन राजकारण झालं. तरीही त्यानंतर मी चार वर्ष काढली. नऊ महिने माझ्यावर आणि कथित पीएवर पाळत ठेवल्याचं मान्य केलं होतं. काय मिळालं काय नाही याचं दुख: नाही. पण मनस्ताप खूप झाला याचं दुख: आहे. आयुष्यात अनेक पदं मी ताकदीने मिळवली आहेत. म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. माझा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे. जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातील जनतेने मला मोठ्या प्रतिसाद दिला आहे आणि आजही देत आहेत,” असं खडसे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. “राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा काँग्रेसने कधीही माझ्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती, तुम्ही एक प्रसंग दाखवून द्या. मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे. एकप्रकारे विनयभंगाचा खटला दाखल करणं तोही बनावट यापेक्षा वाईट काय. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फोन करणं त्यापेक्षा वाईट,” असं खडसेंनी म्हटलं. “भ्रष्टाचाराचा आरोप वैगेरे ठीक आहे, पण विनयभंगाचा आरोप किती वाईट, मी सुटलो त्यातून नाहीतर तीन महिने जेलमध्ये गेलो असतो. बदनामी घेऊन गेलो असतो,” अशी खंत खडसेंनी व्यक्त केली.

अंजली दमानियांची प्रतिक्रिया

दमानियांच्या नावाचा उल्लेख केल्याने या पत्रकार परिषदेनंतर अनेक प्रसारमाध्यमांनी दमानिया यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोन केल्याची माहिती त्यांनीच ट्विटरवरुन दिली आहे. “एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला आणि त्या नंतर घेतलेल्या प्रेस मध्ये त्यांनी नाव घेऊन काही वक्तव्य केले. यावर मला अनेक माध्यमांनी फोन केले, पण यावर मला काहीच बोलायचे नाही. श्री खडसे यांना राजकारणात पुन्हा आल्याबद्दल शुभेच्छा. त्यांनी चांगलं काम करावं हीच इच्छा,” असं ट्विट दमानिया यांनी केलं आहे.

डोकं ठिकाणावर आहे ना?

लोकशाही न्यूजशी बोलतना दमानिया यांनी यासंदर्भात मला स्पष्टीकरण देण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. “आम्ही भष्ट्राचाराविरुद्ध लढतो. जे जे भ्रष्टाचार करतील त्याच्या त्यांच्याविरुद्ध आम्ही लढतो. जर फडणवीसांना भ्रष्टाचार केला तर आम्ही त्यांच्याविरोधातसुद्धा तितक्याच ताकदीने लढू. खडसेंना पुन्हा संधी मिळाली आहे तर त्याचा त्यांनी चांगला वापर करावा. त्यांनी नसत्या गोष्टींमध्ये पडू नये,” असा सल्ला दिला आहे. तर विनयभंगांच्या आरोपावर बोलताना दामानिया यांनी, “विनयभंगाचे आरोप? त्यांचं डोकं ठिकाणावर आहे ना? या जन्मी मी कधी कोणावर विनयभंगाचे आरोप केलेले नाहीयत. ते बोलत असतील असं तर काय बोलतायत ते हे त्यांच त्यांना भान नसावं. असो ते राजकारणात येतायत त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. त्यांनी भ्रष्टाचार करु नये अशी विनंती,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे हे प्रकरण

७ सप्टेंबर २०१७ रोजी अंजली दमानियांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाकोला पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील (आयपीसी) कलम ५०९ (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव किंवा शब्दांचा वापर करणे) अंतर्गत खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला. दमानिया यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एकनाथ खडसे यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला होता. या भाषणात खडसे यांनी आपल्याबद्दल आक्षेपार्ह आणि असभ्य भाषा वापरली, असे दमानियांनी म्हटले होते. खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खडसेंनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दमानिया यांनी वाकोला पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असून, राज्यात महिला असुरक्षित आहेत, असा दावा दमानिया यांनी केला होता. त्यानंतर आयपीसीतील कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा जळगावच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण जळगाव पोलिसांकडे वर्ग केले जाईल असंही सांगण्यात आलं होतं. दरम्यान त्यावेळी दमानिया यांचे आरोप खडसेंनी फेटाळून लावले होते. मी कोणत्याही महिलेचा अवमान करणारे वक्तव्य केलेले नाही, दमानिया यांना उद्देशून बोललेलो नाही असे खडसे यांनी म्हटले होते. दमानिया यांचा माझ्यावरच आरोप करण्यामागे काही हेतू आहे का, दरवेळी फक्त मलाच का टार्गेट केले जाते, असा सवाल त्यांनी विचारला होता.