भूमि अधिग्रहण विधेयकासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले खुल्या चर्चेचे आव्हान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वीकारले आहे. मात्र या खुल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सहभागी व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. गडकरी यांच्यासोबत चर्चा करून ठोस निर्णय होण्याची शक्यता कमी असल्याचा टोलाही हजारे यांनी गडकरी यांना शुक्रवारी पाठविलेल्या पत्रात लगावला आहे.
दि. १३ मार्चला हजारे यांनी ग्रामाविकास मंत्री वीरेंद्रसिंह चौधरी यांना भूमि अधिग्रहण विधेयकासंदर्भात पत्र लिहिले होते. या पत्रास अनुसरून गडकरी यांनी हजारे यांना पत्र लिहून या विषयावर खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले होते. या पाश्र्वभूमीवर हजारे यांनी गडकरी यांना पत्र लिहून त्यांच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा खरपूस समाचार घेतानाच या खुल्या चर्चेचे आव्हान स्वीकारले आहे.