माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांचे नाव न घेता शुक्रवारी राळेगणसिद्घीत जोरदार हल्ला चढविला. त्याला भर सभेतच या पक्षाचेच गोपाल राय यांनी आक्षेप घेतल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीच हस्तक्षेप करीत, गोंधळ घालायचा असेल तर गाव सोडून निघून जा, असे राय यांना सुनावल्यावर ते शांत झाले. काही काळानंतर मात्र राय राळेगणसिद्घी सोडून निघून गेल्याने अण्णा हजारे यांचे आंदोलन आणि आम आदमी पक्षातली दरी रुंदावल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी आम आदमीचे कुमार विश्वास व त्यांच्या सहकाऱ्यांनी राळेगणसिद्घीत राजकीय भाषणबाजी केल्यामुळे नाराजीचा सूर असतानाच सिंग यांनी केजरीवाल यांच्यावर हल्ला चढविल्याने सर्वत्र तो चर्चेचा विषय ठरला आहे. सिंग म्हणाले, अण्णांनी जनलोकपालासाठी आंदोलन पुकारल्यानंतर त्यांच्यासमवेत अनेक लोक होते. त्यानंतर काही सोडून गेले ते आता आमच्यामुळेच अण्णा मोठे झाल्याचे म्हणू लागले आहेत, ही खेदाची बाब आहे. जी गोष्ट अण्णांनी उभी केली आहे, ज्यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे, त्यास कोणी कमी लेखू शकत नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. वेगवेगळे गट, पक्ष स्थापून त्याचा फायदा लाटणाऱ्यांनी त्याचा बोध घ्यावा, असे ते म्हणाले.
अण्णांसह उपोषणास बसलेले आम आदमीचे गोपाल राय यांनी सिंग यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेतला. राजकीय भाषण करू नका, जनलोकपालावर बोला, असे राय सांगत होते, त्याने गोंधळ वाढला व अण्णांना हस्तक्षेप करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेचा पाठिंबा
मनसेचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर यांनी शुक्रवारी हजारे यांची भेट घेऊन जनलोकपालची मागणी व त्यासाठीच्या आंदोलनालाही पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच आपण येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या विधानसभेतही सक्षम लोकायुक्त विधेयक आणावे अशी आमचीही इच्छा असून सोमवारी या विषयावर आपण विधानसभेत चर्चा घडवून आणू, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare asks aap leader to leave fast venue after he takes on v k singh
First published on: 14-12-2013 at 01:56 IST