करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात झपाट्याने वाढताना दिसत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्ध्यांपैकी एक असलेल्या पोलिसांना देखील करोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे. कारण, मागील चोवीस तासांत करोनामुळे चार पोलिसांना जीव गमावावा लागला असून, आणखी ३० पोलिसांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. याचबरोबर राज्यातील करोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता ५ हजार २०५ वर पोहचली आहे. सध्या १ हजार ७० पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ४ हजार ७१ पोलिसांनी करोनावर मात केली असल्याचे वृत्त महाराष्ट्र पोलीस विभागाच्या हवाल्याने एएनआयने दिले आहे. 4 deaths and 30 police personnel found COVID19 positive in the last 24 hours. The total number of positive cases in Maharashtra Police is now 5205 including 4071 recoveries and 1070 active cases: Maharashtra Police — ANI (@ANI) July 5, 2020 करोनाला तोंड देण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे म्हणून हे सर्व करोना योद्धे जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता या करोना योद्ध्यांना करोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात २४ हजार ८५० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, ६१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहचली आहे. देशभरातील तब्बल ६ लाख ७३ हजार १६५ करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ लाख ४४ हजार ८१४ जण, उपाचारानंतर रुग्णालायतून सुट्टी देण्यात आलेले ४ लाख ९ हजार ८३ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १९ हजार २६८ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.