सोशल मीडियावरील 'कॉन्ट्रोव्हर्सी किंग' अशी ओळख असलेला दिग्दर्शक अनुराग कश्यपने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना उद्देशून एक ट्विट करत नवा वाद निर्माण केला आहे. अनुरागने ट्विटरवर एक पोस्ट करत "पंतप्रधानपदी मोदींपेक्षा गडकरीच बरे", असं म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टनंतर सध्या सोशल मीडियावर नवीन चर्चा रंगली आहे. अनुराग कश्यपने यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर टीका केली आहे. यावेळी अनुरागने लोकसभा निवडणुकांचं निमित्त साधत पंतप्रधान पदासाठी मोदींपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी योग्य असल्याचं म्हटलं आहे. "भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या व्यतिरिक्त नितीन गडकरी हेदेखील पंतप्रधान पदासाठी योग्य व्यक्ती आहेत. खरं तर साऱ्याच पक्षांमध्ये भ्रष्टाचार हा होत असतो. मात्र आता या भ्रष्टाचाराचं स्वरुप बदललं आहे. सध्याच्या काळात भ्रष्टाचार म्हणजे काहींसाठी आदर्शचं झाला आहे. या भ्रष्टाचाराला तुम्ही किंवा आम्ही आळा घालू शकत नाही. देशातील राजकारणातून भ्रष्टाचाराचा नायनाट करणं शक्य नसलं तरी सांप्रदायिकता, द्वेष आणि भीतीचं राजकारण हे नक्कीच नष्ट होऊ शकतं", असं अनुराग म्हणाला.मोदींना पाठिंबा देणारा एक मेसेज अनुरागला व्हॉट्स अॅपवर आला होता. त्यामुळे हा मेसेज पाहिल्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. I will tell you a far greater option to Modi within the BJP is Gadkari . One thing you can’t take out of indian politics is corruption. They all are the same. But what you definitely can take out is communalism, the politics of hate and fear. — Anurag Kashyap (@anuragkashyap72) April 13, 2019 दरम्यान, देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या कलाविश्वामध्ये मोदी समर्थक आणि मोदी विरोधक असे दोन गट पडले आहेत. काही दिवसांपूर्वी मोदी सरकार आणि त्यांच्या मित्र पक्षांना मत न देण्याचं आवाहन करणारं एक पत्र ६०० कलाकारांनी दिलं होतं. या पत्राला एक आठवडाही उलटत नाही. तोच ९०० कलाकार मोदींच्या पाठिंब्यासाठी उभे राहिले आहेत. त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कला क्षेत्रातही निवडणुकीचे वारे वाहत असल्याचं दिसून येत आहे.