राज्याच्या नगरविकास विभागाकडून मंगळवारी रात्री उशीरा विविध पालिका आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदाची धूरा गणेश देशमुख यांच्याकडून काढून उल्हासनगर पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हाती सोपविली आहे. तर गणेश देशमुख यांच्याकडे ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बुधवारी पहाटे याबाबतचे वृत्त परिसरात पसरताच 'एक देशमुख गेले आणि दुसरे देशमुख आले' अशी प्रतिक्रीया पालिका क्षेत्रात उमटली. करोना विषाणू संसर्गाविरोधात लढाईत पालिका प्रशासनातील अधिकारी गुंतले असताना गणेश देशमुख यांची बदली झाल्याने विविध चर्चांना उधान आले आहे. करोना संसर्गदरम्यान घेतलेल्या काही निर्णयामुळे रायगडचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार गणेश देशमुखांवर नाराज होते. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना लेखी नाराजी व्यक्त केली होती. मुंबईतील अत्यावश्यक सेवेकरींना तिथेच राहण्याची सोय करावी, यासाठी भारतीय जनता पार्टीने पनवेल बंदची हाक दिल्यावर त्याविरोधात सनदशीर मार्गाने आयुक्त गणेश देशमुख यांनी विरोध केला होता. पालिका क्षेत्रातील करोनारुग्णांसाठी विविध इमारती, मोकळ्या जागा व रुग्णांलयांमध्ये २७०० खाटांचे नियोजन गणेश देशमुख यांनी केलेले आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी एप्रिल २०१८ पालिकेचा कारभार स्विकारला त्यावेळी त्यांनी सिडको महामंडळाकडून आरोग्य व स्वच्छता सेवा हस्तांतरण, पनवेल एसटी डेपोसमोरील अतिक्रमन हटविणे, पालिका क्षेत्रातील जमिनी व मालमत्तांचे सर्वेक्षण करणे, पालिकेच्या सिडको क्षेत्रातील रहिवाशांकडून मालमत्ता कर वसूलीसाठी संपूर्ण प्रणाली राबविणे, रस्ते सुसज्ज करणे, काॅंक्रीटीकरण, वडाळे व देवाळे तलावाचा विकास करणे अशी महत्वाची कामे केली. शहराचा नियोजन आराखड्याचे काम तत्कालिन आयुक्त गणेश देशमुख यांनी अंतिम टप्यात आणले होते. मागील अतिवृष्टीत पनवेल पाण्याखाली गेले त्यानंतर तत्कालिन आयुक्त देशमुख यांनी तब्बल शंभर कोटी रुपयांचा आपत्ती व्यवस्थापनाची कामे हाती घेतली होती. नागरिकांच्या कामाला प्राधान्यांने सोडवणे हे जरी तत्कालिन आयुक्त देशमुख यांनी केले असले तरी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात त्यांच्या कारकिर्दीत एकदाही वाद झाला नाही. करोना संसर्गादरम्यान तब्बल ४० दिवसात एकही साप्ताहिक सुट्टी न घेणारे आयुक्त गणेश देशमुख हे राहत असलेल्या खारघर येथील इमारतीमध्ये पाच रुग्ण करोनाचे आढळले, तरीही त्यांनी काम करणे बंद केले नाही. त्यामुळे स्वच्छ खारघर सारख्या समाजमाध्यमांच्या गटावर त्यांच्या कार्याची नागरिक स्तुती करत होते. बुधवारी नवे आयुक्त सुधाकर देशमुख पदभार स्विकारणार असल्याचे प्रशासनातून प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले.