राज्यात करोनानं थैमान घातल्यानंतर भीतीदायक स्थिती निर्माण झाली होती. रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नसल्यानं मृत्यू झाल्याचे प्रकार असो, वा मृतदेहांची अदलाबदल झाल्याच्या घटनांही समोर आल्या होत्या. करोना काळात राज्यात घडलेल्या या घटनांचा मुद्दा उपस्थित करत भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली. यावेळी शेलार यांनी लोकमान्य टिळकांच्या एका विधानाचीही आठवण करून दिली.

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असून, भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्यात झालेल्या करोना मृत्यू आणि हेळसांडीवरून सरकारवर निशाणा साधला. शेलार म्हणाले, “करोना काळात मृतदेहांची अदलाबदल झाली. अ व्यक्तीचा मृत्यू झाला. पण ब व्यक्तीच्या कुटुंबाला रुग्णाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. ब व्यक्ती रुग्णालयातच होती. मृतदेह गायब झाले. मृत्यूचा दर जास्त आहे. त्यावेळी एका महिलेचा करोनानं मृत्यू झाला. तिच्या मुलाला सांगण्यात आलं की आम्ही पीपीई किट देणार नाही. तू मृतदेह घेऊन ये. अशा प्रकारे मृतदेहांसोबत असंवेदनशीलपणे व्यवहार करण्यात आला. मुंबई महापालिकेनं मृतदेहांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक बॅग चौपट वाढीव दराने घेतल्या गेल्या. एक महिला पीठ आणायला निघाली. ती ड्रेनेजमध्ये पडली. तिचा मृतदेह हाजीअलीला मिळाला,” अशी खंत शेलार यांनी व्यक्त केली.

“यावेळेला आपण लोकमान्य टिळकांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करत आहोत. या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांच्या अग्रलेखांचे एक एक नमुने समोर आले. त्यामधील एक अग्रलेख आजच्या राज्याच्या स्थितीला इतका चपलख बसतो. इंग्रजांचं सरकार असताना टिळक असं म्हणाले होते, ‘हिवताप प्लेग याने पटापट मृत्यू होत आहेत आणि सरकार म्हणतंय आम्ही काम करतोय. हे कुठलं सरकार, हे तर आमच्या स्मशानभूमीचे रखवालदार.’ आजची राज्यातील स्थिती, मृत्यूच्या घटनांमध्ये, मृतदेहांच्या अदलाबदलीमध्ये सरकार स्मशानभूमीचं रखवालदार आहे, असं चित्र आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.