अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून जिल्हा सत्र न्यायालयानं काही मुद्दे उपस्थित केले असल्याचा हवाला देत भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी सामनाचे कार्यकारी संपादक व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. शेलार यांनी तीन ट्विट करत “आता मा. न्यायालयालाच महाराष्ट्र द्रोही आहे म्हणून फटाके फोडणार का? आता उद्याचा अग्रलेख न्यायालयावर..?,” असा सवालही उपस्थित केला आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावर आज रायगड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं काही मुद्दे उपस्थित करत गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली.

न्यायालयानं उपस्थित केलेल्या मुद्यांचा हवाला देत आमदार आशिष शेलार यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “संपादक अर्नब गोसामी यांच्या बाबत रायगडच्या मा. मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेला निवाड्यातील मुद्दे
१) २०१८ सालच्या घटनेबाबत कोणताही ठोस पुरावा आलेला नाही त्यामुळे “अ” समरी अहवाल (क्लोजर रिपोर्ट) स्विकारला गेला.
२)पोलीस कोठडीचे समर्थन करणारे कोणतेही योग्य, संयुक्तिक व कायदेशीर कारणं आढळत नाही.
३) पोलिसांना मोघमपणे तपास करता येणार नाही.
सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी आणि महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या सुडबुध्दीचा, असहिष्णुतेचा पर्दाफाश न्यायालयाने असा केला. आता बोला…,” असं शेलार यांनी म्हटलं आहे.

“आता मा. न्यायालयालाच महाराष्ट्र द्रोही आहे म्हणून फटाके फोडणार का?आता उद्याचा अग्रलेख न्यायालयावर..? खंजीर, तलवार, इतिहासातील शब्दांवर उगाच सगळा भार! उडवा उडवा, शब्दांचे फुलबाजे उडवा! रोज उघडे पडा!!,” असा टोला शेलार यांनी राऊत यांना उद्देशून लगावला आहे.