भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारस पाकिस्तानमधील बालाकोट भागातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळांवर १००० किलो वजनाचा बॉम्ब फेकल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानी हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. १२ मिराज २००० विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यानंतर अनेकजण आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनीही एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या हल्ल्यानंतर 'वृश्चिक राशीच्या पंतप्रधानांनी पाकला नांगी मारली' असे मत व्यक्त केले आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते हा मुद्दा अधोरेखित करत 'इम्रान खान एक संधी मागत असताना मोदी वृश्चिक राशीचे असल्याने त्यांनी पाकिस्तानवर हल्ला करत नांगीचा जीवघेणा फटका दिला' असे मत उपाध्ये यांनी व्यक्त केले आहे. आपल्या पोस्टमध्ये उपाध्येंनी इतिहासातील काही लढायांचे दाखले दिले आहेत. पहिल्या मुद्द्यामध्ये ते म्हणतात उपाध्ये म्हणतात, " पृथ्वीराज चव्हाणाने महंमद घोरीचा पार धुव्वा उडविला.महमद घोरी पृथ्वीराजास शरण आला. 'शरणागतास मरण न देणे' हे ब्रीद पृथ्वीराजाने पाळले. पण 'दीssन, दीssन' म्हणतच महंमद घोरीने स्वारी केली होती. उद्दामपणाची कृती आणि मुखाने 'दीssन दीssन' हा विरोधाभासच शरणागती खोटी आहे हे दाखवीत होता.पण ब्रीद पाळण्याला महत्व देऊन पृथ्वीराजाने महंमद घोरीस सीडून दिले. महंमद घोरीने त्याच प्राणदात्याला फुन्हा स्वारी करून कृतघ्नपणे ठार मारले." तर या पोस्टच्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या काळातील दाखला दिला आहे. ते म्हणतात, "विजापूरचा बहलोलखान संकटात सापडला असता शिवाजी महाराजांच्या सेनापती प्रतापराव गुजरांनी धर्मवाट दिली,त्याच बहलोलखानाने गुजरांना ठार मारले." तिसरे उदाहरण देताना त्यांनी इंदिरा गांधींचा संदर्भ दिला आहे. १९७१ च्या युद्धाचा संदर्भ देताना उपाध्ये म्हणतात, "१९७१ च्या युध्दात पाकिस्तानला हरवून इंदिरा गांधीनी बांगला देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. जगजीत सिंग अरोरा यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नांची पराकाष्ठा करून भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानचा ताबा घेतला. लाहोर, हैद्राबाद काबीज केले. पण सिमला करारमुळे सारे परत गेले.देशभक्तीने प्रेरित होऊन लढणा-या शेकडो जवानांचे शहीद होणे हा पोरखेळ ठरला. वाचेचा आणि कृतीचा मेळ नसलेल्या कृतघ्नांवर दया करणे हे नपुसकत्वाचे लक्षण ठरते हा अनुभव आहे." पोस्टच्या शेवटी त्यांनी इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते हा मुद्दा अधोरेखित केला. इम्रान खान एक संधी मागत असताना मोदी वृश्चिक राशीचे असल्याने त्यांनी पाकिस्तानवर हल्ला करत नांगीचा जीवघेणा फटका दिल्याचे मत उपाध्ये यांनी व्यक्त केले आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते. आता चहुबाजुंनी घायकुतीला आणलेला इम्रानखान माननीय मोदींना "एक संधी द्या" अशी विनवणी करीत आहे कारण देशातच नव्हे संपूर्ण जगात पाकिस्तानबद्दल राग खदखदत आहे. पण इम्रानखाना तुझ्या दुर्देवाने आमचे पंतप्रधान वृश्चिक राशीचे आहेत. ते नांगीचा जीवघेणा फटक्याची शिक्षा दिल्याशिवाय रहाणार नाहीत.आमच्या बहाद्दूर निष्पाप शहीद जवानांच्या हत्येची भळभळ वहाणारी जखम त्यांना स्वस्थ बसू देणार नाही. ते नरेंद्र आहेत. स्वाभिमानी आहेत. करारी आहेत. कर्तव्यनिष्ठ आहेत. जय जवान. जय हिंद. वंदे मातरम. शहीदांना त्रिवार नमन!" ही पोस्ट उपाध्ये यांनी आज सकाळी भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याची बातमी समोर आल्यानंतर केली असून ती प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.