महाराष्ट्रात सुरू झालेल्या विविध सेवाकार्यात गेले तीन दिवस भाजपाचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मंडल आणि बूथ कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष कार्यरत आहेत. या सर्वांशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संवाद सेतू या मोबाईल अ‍ॅच्या माध्यमातून संवाद साधला. त्यानंतर आज (रविवारी) त्यांनी सर्व कामांचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना विविध सूचना केल्या.

यावेळी सध्या या सेवाकार्यात कार्यरत असलेल्या सुमारे सव्वा लाख कार्यकर्त्यांची संख्या आणखी वाढविण्याच्या सूचना यावेळी फडणवीसांनी केल्या. दरम्यान, भाजपाकडून सुमारे ४५० मंडलांमध्ये काम सुरू झाले असून ३०० ठिकाणी कम्युनिटी किचनही सुरू झाली आहेत. १० जिल्ह्यांमध्ये रक्तदानाचे काम सुरू झाले आहे. १००० खेड्यांमध्ये सॅनेटायझेशनचे काम करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी अन्न आणि औषध पुरवठा करण्यासोबतच शेतकऱ्यांना बियाणे आणि खते सुद्धा घरोघरी देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, याचे फडणवीस यांनी कौतुक केले.

आजच्या या ऑनलाइन आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे, सरोज पांडे, व्ही. सतीशजी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, मंगल प्रभात लोढा तसेच इतरही प्रदेश पदाधिकारी सहभागी झाले होते.

“सध्या देशभरात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ही मदत करताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल, याचीही कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी,” असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. “घरी राहायचे असले तरीही सुट्टी नाही. त्यामुळे आपली स्वत:ची काळजी घेतानाच अधिकाधिक लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी काम करा,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.