राज्यातील आरोग्य योजनांवर कोट्यवधी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा सरकारदरबारी केली जाते. मात्र, प्रत्यक्षात याचा फायदा तळागाळातील रुग्णांना होतो का, असा प्रश्न निर्माण करणारी घटना औरंगाबादमध्ये घडली. खुलताबाद तालुक्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) सलाईन स्टॅण्डची व्यवस्था नसल्याने वडिलांसाठी चक्क एका मुलीला सलाईन घेऊन उभे राहावे लागले. हातात सलाईन घेऊन उभी राहिलेल्या मुलीचा फोटो समोर आला आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले. औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील भटजी गावातील एकनाथ गवळी यांच्यावर बुधवारी घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. मात्र त्यांच्या खाटेपाशी सलाईनच्या स्टॅण्डची व्यवस्थाच नसल्याने त्यांची मुलगी धृपदा हिला हातात सलाइन घेऊन ताटकळत उभे राहावे लागले. जवळपास अर्धा तास धृपदा तशीच उभी होती. शेवटी भावानेच एक स्टॅण्ड शोधून आणला आणि या 'जिवंत स्टॅण्ड' ऐवजी लोखंडी स्टॅण्डवर सलाईनला ठेवण्यात आले. धृपदा आणि तिचा भाऊ हे दोघेही सध्या वडिलांची देखभाल करत आहे. आई नसल्याने दोघेही वडिलांची काळजी घेत आहेत. धृपदासोबत झालेल्या प्रकारामुळे घाटी रुग्णालयातील दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अख्ख्या मराठवाड्याचा आरोग्यभार पेलणाऱ्या आणि ९९ एकरांवर पसरलेल्या ११७७ खाटांच्या या रुग्णालयात ही स्थिती असेल तर दुर्गम ग्रामीण भागांतल्या सरकारी रुग्णालयांची अवस्था किती भयावह असेल, असा प्रश्न या ‘जिवंत सलाइन स्टॅण्ड’मुळे उपस्थित झाला आहे. राज्यातील आरोग्य योजनांवर कोट्यवधी रुपयांची तरतूद आणि खर्च कागदोपत्री नोंदवणाऱ्या महाराष्ट्रात प्रत्यक्ष परिस्थिती किती भीषण आहे आणि सलाइन टांगणारा स्टॅण्ड घेता येईल इतकीही तरतूद कशी नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.