बंगळुरू-पुणे महामार्गावर जीप आणि ट्रकचा झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत झालेले सातही जण औरंगाबादमधील आहेत. भरघाव जाणाऱ्या जीपचे टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

बंगळुरू-पुणे महामार्गावर बेळगाव शहरातील श्रीनगर गार्डनजवळ हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव निघालेल्या जीपचे अचानक टायर फुटले आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. जीप दुभाजकावरून दुसऱ्या बाजूला रस्‍त्‍यावर गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादहून जीपने सात जण बंगळुरूला निघाले होते. बेळगावजवळ गेल्यानंतर जीपचे समोरील टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ती दुभाजककावरून पलीकडील रस्त्यावर गेली. त्याचवेळी कोल्हापूरकडे जाणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसली. धडक जबरदस्त असल्याने जीपमधील पाच जण जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले होते.