सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावे, तर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय घटनापीठानं एकमतानं दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठानं दिला. या निकालामुळे राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच निकालानंतर शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षामध्ये शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या राऊत यांनी या ट्विटमधूनही भाजपाची फिरकी घेतली आहे.

‘अयोध्येमध्ये राम मंदिर आणि महाराष्ट्रात सरकार… जय श्रीराम!’ असं ट्विट राऊत यांनी केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी ‘पहिल्यांदा मंदिर मग सरकार’ असंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अयोध्या प्रकरणाचा निकाल लागला आता राज्यातील महाराष्ट्रात सरकार कोण स्थापन करणार याचाही निकाल लागेल असे सूचक संकेत त्यांनी या ट्विटमध्ये दिला आहे. मागील वर्षभरामध्ये राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेनेने आक्रमाक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. राम मंदिर प्रश्नासंदर्भात शिवसेनेने वर्षभऱामध्ये अनेक कार्यक्रम घेतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे काही प्रमुख नेते याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये अयोध्येला गेले होते. शरयु नदीच्या किनारी त्यांनी महाआरतीही केली होती. याच दौऱ्याची जाहिरातबाजी करण्यासाठी पक्षाने राज्यामध्ये ‘पहले मंदिर फिर सरकार’ असे बॅनर्स लावले होते. लोकसभा निवडणुकीच्या काही महिनेआधीच शिवसेनेने राम मंदिर बांधण्यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. उद्धव यांच्या या दौऱ्याची देशभरात चर्चा झाली होती.

दरम्यान, शुक्रवारीच शिवसेनेकडून राम मंदिराचा निर्णय काहीही लागला तरी ते सरकारचे यश आहे असं समजू नये असं जाहीर करण्यात आलं होतं. याच पद्धतीची प्रतिक्रिया राऊत यांनी निकाल लागल्यानंतर दिली आहे. “राम मंदिरासाठी झालेले आंदोलन हे कोण्या एका पक्षाचे नव्हते, यामध्ये सर्वपक्षाचे लोक होते. राम मंदिराचा अध्यादेश आणावा अशी मागणी आम्ही (शिवसेनेने) केली होती. मात्र त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघा असं सांगितलं होतं. आज अखेर या खटल्याचा निर्णय लागला. न्यायलयाने आज दिलेला निर्णय सगळ्यांनी मान्य करायला हवा. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा आहे सरकारचा नाही,” असा टोलाही राऊतांनी भाजपा सरकारला लगावला आहे.