साक्षरता अभियानांतर्गत खडू-फळा योजनेत गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेले साहित्यिक बाबा भांड यांची सरकारने राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केल्याने संपूर्ण साहित्य वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने बुधवारी या मंडळावरील नियुक्त्या जाहीर केल्या. त्यात बाबा भांड यांची नेमणूक वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. १९९४-९५ला प्रौढ साक्षरता अभियानांतर्गत खडू-फळा योजनेसाठी बाबा भांड यांनी बुलढाणा जिल्ह्य़ात शालेय साहित्याचा पुरवठा केला होता. तेव्हा बाबा भांड यांचे साकेत प्रकाशन कार्यरत होते. अक्षरधारा या पुस्तकाच्या पुरवठय़ात मोठा घोळ झाल्याचा आरोप पुरवठय़ाचे कंत्राट न मिळालेल्या इतर कंत्राटदारांनी केला. या कंत्राटदारांनी तशी तक्रार बुलढाणा पोलीस ठाण्यात नोंदवली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी केल्यानंतर यात गैरव्यवहार झाला असल्याचे सकृतदर्शनी आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी भांड यांच्यासह तेव्हाचे प्रौढ शिक्षण विभागातील अधिकारी व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. यानंतर बाबा भांड यांना अटक करण्यात आली. तीन दिवस ते पोलीस कोठडीत होते. नंतर त्यांना जामीन मिळाला. हे प्रकरण अजूनही बुलढाण्याच्या न्यायालयात प्रलंबित असून या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी तीन महिन्यांपूर्वी झाली होती. त्या सुनावणीच्यावेळी बाबा भांड न्यायालयात हजर होते. पोलिसांव्यतिरिक्त या गैरव्यवहाराची चौकशी सरकारी पातळीवरसुद्धा करण्यात आली. त्यात या प्रकरणात बुलढाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी भिशीकर यांच्यासह अनेक अधिकारी दोषी आढळून आले होते. या सर्वावर शासनाने कारवाई केली होती. प्रौढ साक्षरतेच्या पुस्तकांबाबतचे प्रकरण बुलढाणा येथील न्यायालयात सुरू आहे. त्याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. - बाबा भांड