केंद्र सरकारच्या ‘सांसद आदर्श ग्राम’ योजनेच्या माध्यमातून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव ‘आंबडवे’ जगाच्या नकाशावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार अमर साबळे यांनी दिली. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आंबडवे (ता. मंडणगड) येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून साबळे बोलत होते. या वेळी त्यांनी आंबडवे येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना आदर्श ग्राम योजनेचा प्रशासनाने सादर केलेला सुमारे ११० कोटी रुपयांचा प्राथमिक प्रारूप आराखडा विशद केला. आंबडवे पंचक्रोशीसह संपूर्ण मंडणगड तालुक्यात विकासाच्या मूळ प्रवाहात आणणारा हा आराखडा १५० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामध्ये बाणकोट-पंढरपूर राज्यमार्गाचे दुवदर किरणाचे काम प्रस्तावित आहे. त्यामुळे मंडणगड ते आंबडवे हे १८ कि. मी. अंतर पार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होणार. याशिवाय शिगवण ग्रामपंचायत हद्दीतील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे ई-लìनग स्कूलमध्ये रूपांतर सोलर सिस्टीम लावलेली आधुनिक व विजेच्या वापरात स्वयंपूर्ण असलेल्या घराची निर्मिती पर्यटकांसाठी अद्ययावत निवासव्यवस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस चौकी, मोफत वायफाय सेवा तसेच इंटरनेटच्या माध्यमातून जगाला आंबडवे सहज दिसेल, असा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली असल्याचे खा. अमर साबळे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, आमदार संजय कदम, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, प्रांताधिकारी जयराम देशपांडे, नगराध्यक्षा श्रुती साळवी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.