वर्धेतील गरजूंसाठी २० लाख रूपयांची धान्याची मदत करण्याचा निर्णय बजाज परिवाराने घेतला असून उद्या (मंगळवार) पासून शिक्षा मंडळचे स्वयंसेवक स्वत: धान्य वाटप करणार आहेत.

समाजाने समाजाच्या कामात आले पाहिजे, या विनोबाजींच्या उक्तीनुसार हे कार्य करण्याचे ठरले आहे, अशी संस्थेचे विश्वस्त संजय भार्गव यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.

सुप्रसिध्द उद्योगपती राहुल बजाज प्रमुख असलेल्या जानकीदेवी बजाज ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून हे कार्य होत आहे. येथील भूमीपूत्र असलेला बजाज परिवार पुणे निवासी असला तरीही वर्धेतील विविध उपक्रमात त्यांचा नियमित सहभाग असतो. करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नवनवीन आव्हानं दिसून येत आहेत. वर्धेतील गरजू व झोपडपट्टी परिसरातील कष्टकऱ्यांचा रोजगार ठप्प झाल्याने त्यांना विविध मार्गांनी मदत केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर येथील कष्टकरी कुटुंबांना पाच किलो गहू, दोन किलो तांदूळ, एक किलो तूरदाळ, ७५० ग्रॅम खाद्य तेल व एक साबण असं दिलं जाणार आहे. पहिल्या टप्यात शहरात व लगतच्या ग्रामपंचायत परिसरात मदत मिळेल. पुढे ग्रामीण भागात ही सेवा सुरू होईल. मदतीचा पहिला टप्पा सहा हजार कुटुंबापर्यंतचा आहे. याचबरोबर मदतीला मर्यादा नसल्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे.

ही मदत करतांना संस्थेचे कर्मचारी स्थानिक नगरसेवक किंवा जबाबदार व्यक्तींची मदत घेतील जाणार आहे. विश्वस्त संजय भार्गव यांनी सांगितले की, प्रशासनाशी बोलणे झाले आहे. रितसर परवानगी-घेवून मदत वाटप होणार आहे.

देशासमोर उभ्या असलेल्या करोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारला मदत म्हणून वाहनउद्योग श्रेत्रातील बजाज समुहाने १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. या निधीचा वापर देशात आरोग्यसेवा पुरवाणाऱ्या यंत्रणांचे सबलिकरण करण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी केला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे