लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने महाराष्ट्रातील पक्ष नेतृत्वात बदल केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्षांबरोबरच काँग्रेसने पाच कार्याध्यक्षांचीही निवड केली आहे. नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अशोक चव्हाण यांनादेखील निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता पक्षाने राज्यातील नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.