२४ ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वात मोठी उलथापालथ राज्याच्या राजकारणात पहायला मिळाली आहे. कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यानंतर शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या ३ पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या मार्फत राज्यात सत्ता स्थापन करण्याचं ठरवलं. मात्र या सर्व घडामोडींवर मात करत, शनिवारी सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे बारामीतीचे आमदार अजित पवार यांना उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयाचे राज्यात साहजिकच पडसाद पहायला मिळाले. राज्यभरातून अजित पवारांच्या या निर्णयावर प्रतिक्रीया येत असताना बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा समर्थनार्थ पोस्टर्स झळकतली आहेत. आम्ही, ८० वर्षांच्या योद्ध्यासोबत ! असा संदेश लिहत बारामतीकरांनी शरद पवार यांना आपला पाठींबा दर्शवला आहे. या सर्व प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवारांची विधीमंडळ नेते पदावरुन हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी एक आठवड्याच्या कालावधी दिला आहे. त्यामुळे या काळात राज्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.