लग्नाच्या आनंदावर विरजण पाडणारी एक दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. लग्न झाल्यानंतर पाचव्या दिवशीच नवरदेवाचा हृदय विकाराने मृत्यू झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक करांडे (वय-२७) असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव आहे. ते वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील रहिवासी होते. अशोक हे नागपूरला एका कंपनीत नोकरीस होते. त्यांचे आई-वडील शेती करतात. एक भाऊ आणि दोन बहिणी असा त्यांचा परिवार आहे. 21 मे रोजी अशोकचे लग्न माजलगाव तालुक्यातील खेर्डा येथे थाटात पार पडले होते. घरी आल्यावर हे नवदांपत्य सुखरुपरीत्या देवदर्शन घेऊन आलं होतं.

त्यानंतर रविवारी(दि.26) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बहिणीच्या मुलांना कपडे खरेदी करण्यासाठी जात असतानाच अचानक भोवळ येऊन ते दुचाकीवरुन कोसळले. घटनेनंतर उपस्थित नागरीकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.