‘मी अन् माझे’ इतकाच संकोचित विचार न करता प्रत्येकाने पर्यावरणाच्या समर्थनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. झाडांमुळे मिळणाऱ्या शुध्द हवेचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्षलागवड करून ती जगवावीत, असे सांगत आणि ‘येऊन येऊन येणार कोण? झाडाशिवाय आहेच कोण!’ अशी घोषणा देत चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते सयाजी िशदे यांनी सह्यद्री देवराई प्रकल्पात वृक्ष संगोपनाची चळवळ गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच जानेवारीत शेवटच्या आठवडय़ात महाराष्ट्रातील पहिले वृक्ष संमेलन बीड येथे घेण्याची घोषणाही त्यांनी केली.

बीड  शहराजवळ पालवण येथील वनविभागाच्या दोनशे हेक्टर परिसरात मागील काही दिवसांपासून सह्यद्री देवराई हा वृक्ष लागवडीचा प्रकल्प आकाराला आला आहे. अभिनेते सयाजी िशदे यांनी वृक्ष मित्र आणि नागरिकांच्या पुढाकारातून या ठिकाणी काम सुरू केले आहे. विविध जातीच्या पावणे दोन लाख वृक्षांची या ठिकाणी लागवड करण्यात आली असून काही दिवसात हा ऑक्सिजन झोन तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २१ डिसेंबर रोजी सह्यद्री देवराई प्रकल्पात जाऊन सयाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी शासन आणि लोकसहभागातून प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला. मी अन् माझे इतकाच संकोचित विचार न करता झाडांमुळे मिळणाऱ्या शुध्द हवेचे महत्त्व लक्षात घेऊन झाडे जगवण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील पहिले वृक्ष संमेलन जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवडय़ात देवराई प्रकल्पात घेण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. या संमेलनाला राज्यभरातील पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित राहणार असून वृक्ष पालखी काढण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अरिवद जगताप आदी उपस्थित होते.