महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावादाचा फटका साहित्यिकांनाही बसला आहे. सीमाभागात होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी जाणाऱ्या मराठी साहित्यिकांनी पोलिसांनीच प्रवेश नाकारला आहे. कर्नाटकातील खानापूर तालुक्यात असलेल्या इदलहोड येथे गुंफन मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्याआधीच मराठी साहित्यिकांना गावबंदी घालण्यात आली आहे. या निर्णयावर मराठी साहित्यिकांनी संताप व्यक्त केला आहे.

इदलहोडमध्ये गुंफन मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून मराठी साहित्यिक जाणार होते. पण, संमेलनाआधीच मराठी साहित्यिकांना गावबंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे कर्नाटक पोलिसांनीच साहित्यिकांना प्रवेश नाकारला आहे.

“कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध”

या निर्णयाचा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी निषेध केला आहे. “मराठी साहित्यिकांना कर्नाटकमधील एका मराठी साहित्य संमेलनासाठी जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांना कर्नाटक पोलिसांनी पोलिसांनी बेळगावमध्येच रोखले. महाराष्ट्र सरकारचा मराठी भाषा खात्याचा मंत्री या नात्याने कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा मी तीव्र निषेध करतो,” असं देसाई यांनी म्हटलं आहे.

अलिकडेच झाला होता वाद

महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावादाचा मुद्दा अनेक वर्षांपासून सातत्याने ऐरणीवर येत राहिला आहे. अलिकडेच कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर हा वाद पुन्हा उफाळून आला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालण्याची भाषा त्यांनी केली होती. त्या वक्तव्यानंतर सीमाभागात हिंसाचारही झाला होता. ‘कनसे’कडून महाराष्ट्रातून बेळगावमध्ये जाणाऱ्या बसेस फोडण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर पाट्यांचीही तोडफोड करण्यात आली होती.