भाई जगताप यांनी दापोलीत ‘मालवणी टच’ रोखला

दक्षिण कोकणात काँग्रेसने भाजपला सॉफ्टकॉर्नर दाखवला असला तरी नारायण राणे आणि नीलेश राणे यांच्या या राजकीय खेळीला दापोलीत मात्र पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भाई जगताप यांनी चांगलाच शह दिला आहे. येथे काँग्रेसने शिवसेनेशी केलेली सलगी त्याच राजकारणाचा भाग असून राणे समर्थक गटामध्ये त्यामुळे नाराजीचे वातावरण आहे. या नवीन राजकीय समीकरणामुळे एका बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटण्याची शक्यता असताना दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे वर्चस्व पुन्हा वाढण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

मुळात दक्षिण कोकणात गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसच्या निर्णयप्रक्रियेत राणे पिता-पुत्रांची भूमिका महत्त्वाची ठरवली जात आहे. त्यासाठी सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्य़ातील अनेक पदाधिकारी नेते व कार्यकत्रे त्यांच्या संपर्कात असतात. त्यातूनच जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांत त्याच्या समर्थकांचा मोठा गट तयार झाला आहे. राणे पिता-पुत्रांनी शिवसेनेला एक क्रमांकाचा शत्रू ठरवलेला असल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या साथीने भाजप आणि अन्य पक्षांनाही आपल्या मोहिमेत सॉफ्टकॉर्नर देण्याचे धोरण आखले आहे. दापोलीच्या नगराध्यक्ष निवडणुकीसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही त्याच दृष्टीने प्रयत्न करण्याची राणे व समर्थकांची योजना होती. यासाठी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनाविरोधी मोच्रेबांधणीसाठी दापोलीत हजेरी लावण्याचा नीलेश राणे यांचा मानस होता, पण भाई जगताप दापोलीत ठिय्या मांडून बसल्याने नगराध्यक्ष निवडणुकीत येथे ‘मालवणी टच’ पाहायला मिळाला नाही. विशेष म्हणजे भाई जगताप यांनी थेट आघाडी तोडून शिवसेनेला साथ देण्याबाबत आग्रह दाखवल्यानेच भाजपसह काँग्रेसची आघाडी होऊ शकली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मात्र काँग्रेसच्या अर्थात भाई जगपात यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे आमदार संजय कदम यांची राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याचे संकेत असून शिवसेनेला पुन्हा भरारी घेण्याचे बळ मिळाले आहे. यंदाच्या निवडणुकीत सूर्यकांत दळवी यांच्यासह रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सूत्रे हाती घेतली आहेत. यावरून दोन्ही समर्थक गटांचे वाद होण्याची शक्यता असली तरी नवीन राजकीय समीकरणामुळे राष्ट्रवादीला या परिस्थितीचा जास्त फायदा घेता येणार नाही, अशी शक्यताही राजकीय निरीक्षकांत वर्तवण्यात येत आहे.