* सरकारी, निमसरकारी, विमा, बँक कर्मचाऱ्यांचा कडकडीत बंद  *  एस.टी., रिक्षा, दुकाने सुरू राहिल्याने ‘बंद’ जाणवलाच नाही
केंद्र व राज्य सरकारचे कामगारविरोधी धोरण, वाढती महागाई तसेच प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोनदिवसीय ‘भारत बंद’ला आजच्या पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी केला. सर्व सरकारी, निमसरकारी, विमा व बँक कर्मचारी या बंदमध्ये १०० टक्के सामील झाल्याने सर्वच कार्यालयांमध्ये शुकशुकाट असल्याचे दिसून आले. तर या बंदमध्ये व्यापाऱ्यांसह एस.टी. व रिक्षा वाहतूकदार सहभागी न झाल्याने जिल्ह्य़ातील जनतेला ‘भारत बंद’ जाणवलाच नाही. जनजीवन नेहमीप्रमाणे सुरळीत होते. बंदच्या काळात कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे जिल्हा प्रशासन व पोलिसांनी सांगितले.
महागाई, निर्गुतणूक, वेतनवाढ, सरकारचे कामगार विरोधी धोरण आदी विविध मागण्यांसाठी देशभरातील प्रमुख कामगार व कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या दोनदिवसीय ‘भारत बंद’ला आज बुधवारपासून सुरुवात झाली. या देशव्यापी बंदचा फटका जीवनावश्यक सेवेला बसू नये म्हणून सरकारने योग्य ती खबरदारी घेतल्यानंतरही सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी या बंदमध्ये सामील झाल्याने आर्थिक व्यवहार थंडावल्याचे दिसून आले. मंगळवार (१९ फेब्रुवारी)च्या शिवजयंतीनिमित्तच्या सुट्टीला जोडूनच या बंदचा मुहूर्त साधण्यात आल्याने  बँकांचे व्यवहार तब्बल तीन दिवस ठप्प राहणार आहेत. तर सरकारी, निमसरकारी, विमा कंपन्यांचे कर्मचारीही या बंदमध्ये सहभागी झाल्याने ही सेवाही तीन दिवस कोलमडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील सरकारी, निमसरकारी, विमा, बँक कर्मचारी या बंदमध्ये सहभागी झाले असून, बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचे राज्य कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, आज सकाळी जयस्तंभ येथून निघालेल्या मोर्चात सुमारे चारशे ते साडेचारशे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे रूपेंद्र शिवलकर, सुधाकर सावंत, बँक कर्मचारी संघटनेचे राजेंद्र तडवी आदी नेत्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
या ‘भारत बंद’मध्ये एस. टी. कर्मचारी तसेच रिक्षा वाहतूकदार व व्यापारी संघटना सहभागी न झाल्याने सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. एकूणच आजच्या पहिल्या दिवसाचा हा बंद रत्नागिरीकरांना जाणवलाच नाही.