कोरेगाव भीमा हिंसाचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य पोलीसही जबाबदार असून मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारानंतर पोलिसांना दिलेल्या आदेशांची चौकशी आयोगाने माहिती मागवावी, अशी विनंती भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मात्र, चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकरांनी संभाजी भिडे यांचा उल्लेख करणे टाळले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी त्यांची बाजू चौकशी आयोगासमोर मांडली. प्रकाश आंबेडकर यांनी चौकशी आयोगासमोर सांगितले की, कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास हिंसाचारास सुरुवात झाली. त्याची माहिती मला मिळताच त्या क्षणी मी पुणे ग्रामीण पोलिसांशी फोन वरुन संपर्क साधला. मात्र, पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच या घटनेला मुख्यमंत्री, सचिव, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, केंद्रीय गुप्तचर संघटना यासोबतच पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहेत. या सर्वांनी आयोगासमोर उपस्थित राहावे. त्याचबरोबर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी बिनसरकारी उच्चस्तरीय समिती स्थापन केली. त्या समितीमध्ये उपमहापौर सिध्दार्थ धेंडे होते. त्या समिती मार्फत तयार करण्यात आलेल्या अहवालाशी सहमत नसून पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विरोधाभास असल्याचा दावाही त्यांनी केला. चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकरांनी संभाजी भिडे यांचा उल्लेख करणे टाळले आहे. मात्र, पत्रकारांशी बोलताना त्यांनी हिंसाचारासाठी संभाजी भिडेच जबाबदार आहेत, असा पुनरुच्चार केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhima koregaon violence prakash ambedkar blames sambhaji bhide accuses cm devendra fadnavis
First published on: 13-11-2018 at 15:44 IST