सूर्या नदीच्या अर्थशुष्क पात्र, ओहोळातील दगड आणि झाडांच्या खोडांवर रंगरंगोटी

नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू : डहाणू तालुक्यातील  खानीव गावात भू-कलेचा आविष्कार साकारण्यात आला आहे. त्यामुळे निसर्गातील सौंदर्यात आणखी भर पडली असून ही भू-कला पर्यटकांना आकर्षित करीत आहे.

सूर्या नदीच्या अर्धशुष्क पात्रात दगडांवर ही भू-कला साकारण्यात आली आहे. खानिव येथील गर्द झाडीतून जाणाऱ्या ओहळात काळ्या दगडांवर शुद्ध चुन्याचे पट्टे मारून या आकर्षक आकार दिल्याने ही भूरचना जंगल सफरींना आकर्षित करीत आहे. रानातून जाणाऱ्या आदिवासी बांधव  क्षणभर थांबून त्या कलेला दाद देत आहेत, असे कलाकारांचे मत आहे.    वास्तुविशारद प्रतीक धानमेहेर आणि मुंबईमधील वास्तुविशारद विस्मयी कारंडे  आणि राज्यातील विविध भागांतून आलेल्या १४ कलाकारांनी दोन दिवसांत हा आविष्कार साकारला आहे.  रंगकामासाठी जांभूळ या झाडाची फांदी आणि शुद्ध चुना वापरण्यात आल्याची माहिती प्रतीक धानमेहेर यांनी दिली. शुद्ध चुन्याचा वापर केल्याने नदीतील पाण्याला आणि भूभागाला हानी पोहोचणार नाही  दगडांच्या पाण्यात पडणाऱ्या प्रतिबिंबाने त्या संपूर्ण कलेला वेगळीच छटा आल्याचे  त्यांनी सांगितले.

कलेचे वेगळेपण

भू-कला ही साधारण १९७० च्या दशकात नावारूपास आलेली कला. अँडी गोल्डस्वर्दी या महान कलाकाराने या कलेला आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवून दिले. कोणतेही साधन न वापरता, जंगलात मिळेल त्या साहित्याने कला आकारणे म्हणजे भू-कला. जगातील बहुतांश आदिवासी समाज अशाच कलांमधून व्यक्त होत आला आहे.

कित्येकदा जंगलात, हिमालयात किंवा नदीकिनारी फिरायला गेल्यावर त्या भागाचे छायाचित्र काढणे इतकेच काही ते आपले त्या भागाशी नाते. पण काही वेळ तिथे व्यतीत करून तेथील निसर्गाला समजून ही कला रूप घेते. भलेही ही कला तात्पुरती असली तरी सामान्यांच्या मनात तिचे खोल अस्तित्व निर्माण होते.

– प्रतीक धानमेहेर, कलावंत