रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा : जव्हार – वाडा या मार्गावर जव्हार पासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या कासटवाडी येथे ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या गाडीला आग लागल्याने त्याचा जळून जागीच मृत्यू झाला. यावेळी ट्रकही जळाली.

जव्हार येथून वाड्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे गाडीवरील ताबा सुटल्याने त्याची दुचाकी  समोरुन येणा-या ट्रकवर आदळली. दुचाकीची पेट्रोल टाकी फुटून आग लागली. या आगीने ट्रक व दुचाकी दोन्ही वाहनांना घेरले गेले. याच वेळी अपघात ग्रस्त तरुण या दोन्ही वाहनात अडकून पडल्याने  त्याचा जागीच जळून मृत्यू झाला.

कासटवाडी या वळणावर गेल्या पाच वर्षांत पन्नासहून अधिक अपघात झाले असुन पंधराहुन अधिक जणांचे बळी गेले आहेत. अत्यंत धोकादायक असलेल्या या वळणावर सुरक्षित वाहने चालविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीही उपाय योजना केलेली नाही.

या अपघातामध्ये ठार झालेला तरुणाचे नाव अजित विष्णु वाढू असे असुन तो जव्हार जवळील  वाडुपाडा या गावचा रहिवासी आहे.